Thumbnail

संदीप भानुदास तापकीर (एम.ए. (इतिहास व मराठी), पत्रकारिता) हे इतिहासअभ्यासक, दुर्गअभ्यासक व शिवव्याख्याते आहेत. त्यांची ‘छत्रपती श्री शिवराय’, ‘महाराजांच्या जहागिरीतून… पुणे जिल्ह्यातील २९ किल्ले’, ‘वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले’, ‘अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले‘, ‘चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।‘, ‘महाराष्ट्राची दुर्गपंढरी : नाशिक जिल्ह्यातील किल्ले‘ आणि ‘निजामशाहीच्या गतवैभवाची स्फूर्तिस्थाने : अहमदनगरचे गडकोट‘ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘रायगड : राजधानी स्वराज्याची’ या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘मराठी शब्दकोश’ या प्रकल्पात शब्दकोश खंड – ४, ५ व ६ या तीन खंडांचे साहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. ‘अरुणगंध’ (अरुण बोऱ्हाडे यांच्या साहित्यिक, सामाजिक, कामगार व राजकीय कार्यकर्तृत्वाचा आढावा) या गौरवग्रंथाचे संपादन त्यांनी केले आहे. किल्ल्यांवरील आद्यग्रंथ असणार्‍या चिं. गं. गोगटे यांच्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २’च्या दुसर्‍या आवृत्तीचे ते एक संपादक आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे दिल्या जाणार्‍या कै. निनादराव बेडेकर स्मृती पुरस्काराबरोबरच त्यांना इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. केवळ किल्ल्यांना वाहिलेला ‘दुर्गांच्या देशातून…’ हा महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक ते २०१२पासून आजतागायत दर वर्षी संपादित करत आहेत. या अंकातून त्यांनी अनेक दुर्गभटक्यांना लिहिते केले आहे. नव्या-जुन्यांची सांगड घालणार्‍या या अंकातून एकाही लेखकाचा लेख पुन्हा न घेण्याचे सूत्र त्यांनी कमालीचे यशस्वीपणे राबविले आहे. यातून अनेक लेखक तयार झाले आहेत. त्यांनी ‘दुर्गसंवर्धनाची पहाट…’ या दुर्गसंवर्धनविषयक स्मरणिकेचे संपादन केले आहे. कृष्णकांत कुदळे यांच्यावरील ‘मैत्रेय’ आणि प्रमोद बेल्हेकर यांच्यावरील ‘आत्मानंद’ या गौरवांकांचेही त्यांनी संपादन केले आहे. त्यांचे अनेक दैनिकांमध्ये इतिहास, दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धन या विषयांवर लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी लोकमत, पुढारी या वर्तमानपत्रांसाठी सदर लेखनही केले आहे. ‘दुर्गांच्या देशातून…’ या दिवाळी अंकासाठी त्यांना मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील ४००पेक्षा अधिक किल्ले अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहिले आहेत; तसेच अनेक मान्यवरांना महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले दाखविले आहेत. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचे लेखनिक म्हणून (१९९९-२००२) त्यांनी काम केले आहे. ते सध्या विश्वकर्मा पब्लिकेशन्समध्ये सहसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ५०हून अधिक पुस्तकांचे संपादन केले आहे.
संपर्क : संदीप भानुदास तापकीर, ‘श्रीनंदनंदन’ निवास, विठ्ठल मंदिरामागे, वाघेश्वरवाडी, मु. पो. चऱ्होली बुद्रुक (आळंदी देवाचीजवळ), ता. हवेली, जि. पुणे-४१२१०५. भ्रमणध्वनी : ९८५०१७९४२१/९९२१९४८५४१
Email : sandeeptapkir@rediffmail.com

Showing all 9 results